नवी दिल्ली – छत्तीसगढचे माजी उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव अर्थात टी. एस. सिंहदेव अर्थात टी. एस. बाबा यांनी एका हिंदी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना उत्तरे देत भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला.यावेळी पुन्हा भाजप सत्तेत आली तर देशाची घटनाच बदलली जाईल असे जे दावे केले जात आहेत त्यासंदर्भात सिंहदेव यांना विचारल्यावर त्यांनी त्यावरही भाष्य केले.
देशात बहुमताचा दुरूपयोग होत असून त्यामुळे लोकशाहीचा ढाचाच संकटात असल्याचा त्यांचा दावा आहे. विरोधी पक्षांना चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षांना दाबले तरच आपण तिसऱ्यांदा सत्तेत येऊ असे सत्तेतील पक्षाला वाटते आहे व त्याच दिशेने त्यांचे काम सुरू आहे. त्यांनी बहुमताच्या आधारावर अनेक कायदे केले. अशा अनेक निर्णयांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे गेली.
सप्टेंबर पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी नाही. हे घटनात्मक संकट नाही का? न्यायालयानेच निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉंड घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. ईडीला आपल्या अधिकारांचा संयमाने वापर करण्यास सांगितले आहे.
कोणाला पोलीस ठाण्यात बसवण्याचा पोलीस अधिकाऱ्याला अधिकार आहे म्हणून कोणालाही पोलीस ठाण्यात बसवायचे का? संख्याबळ आणि बहुमताच्या आधारावर सगळेच बदलण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. देशाचे संविधानही बदलणार असे त्यांचेच लोक म्हणत आहेत अशी टीका सिंहदेव यांनी भाजपवर केली.