किवळे, (वार्ताहर) – देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील परंडवाल चौकात कापूर ओढ्यावरील पुलाचे कठडे तुटले आहेत. त्यामुळे, पूल वाहतुकीस धोकादायक बनला असून देहू नगरपंचायतीने पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जून महिन्याच्या अखेरीस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी पार पडणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी देहूत दाखल होत असतात. हा पूल वाहतुकीस धोकायदायक झाल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्रीच्यावेळी या भागात अंधार असतो. पालखी सोहळ्याच्या पूर्वी हा पूल दुरुस्त करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. देहू ते देहूरोड हा पालखी मार्ग ५ किलोमीटर असून अरुंद आहे. येथे वाहतूक कोंडी होते.
तळवडे, चाकण येथे कामानिमित्त हजारो वाहने पालखी मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.