पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या इयत्ता अकरावी अॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ३९ हजार ८६० जागा रिक्तच राहिल्याची बाब समोर आली आहे. पुणे विभागात ९५१ कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमांच्या १ लाख १७ हजार ९९० प्रवेशाची क्षमता असून त्यातील केवळ ७८ हजार १३० जागांवरच प्रवेश झाले असून, अद्यापही ३९ हजार ८६० जागा रिक्तच राहिल्याची बाब समोर आली आहे. नामांकित व सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवित असल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या इयत्ता अकरावी अॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपुर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय अॅनलाइन प्रवेश पद्धतीचा अवलंब केला जातो. दरवर्षी बहुसंख्य महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहात असून, या वर्षीही हीच स्थिती कायम असल्याचे चित्र आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार ३९३ महाविद्यालयांत एकही प्रवेश झालेला नाही. ५६० महाविद्यालयांत २० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेत विभाग माध्यमानुसार एकूण प्रवेश क्षमतेच्या कोट्यातील प्रवेशासह केवळ ७० टक्के जागा भरल्या आहेत. त्यामध्ये १०० टक्के प्रवेश झालेल्या विभाग व माध्यमांची संख्या १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
व्यवस्थापन कोटाही रिकामाच
महाविद्यालयांच्या व्यवस्थापन स्तरावरील कोट्यातील प्रवेशही केवळ ५० टक्केच झाले आहेत. इनहाऊन कोट्यातील ३५ ते ४० टक्के, अल्पसंख्याक कोट्यातील ३५ ते ५० टक्केच प्रवेशाच्या जागा भरल्या आहेत. प्रवेश झाले नाहीत व त्याच्या जागाही प्रत्यार्पित केल्या नसल्याची संख्याही मोठी आहे.