मुंबई – रामदास कदम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांचा हात नसला तर हे घोटाळे होऊच शकत नाही, मी त्यांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार आहे. यातील 2 प्रकरणांची कागदपत्रे मी किरीट सोमय्या यांना देणार आहे, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान परब पुढे बोलताना म्हणाले की, किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे आण्णा हजारे आहेत, त्यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या घोटाळ्यांची ईडी चौकशीची मागणी करावी असे परब यांनी म्हटले आहे.
अनिल परब म्हणाले की, एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या 13 खासदारांच्या जागेसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. ठाण्याची जागा आनंद दिघेंनी शिवसेनेकडे खेचून आणली होती, पण त्या जागेसाठी संघर्ष करावा लागतो आहे.
संजय शिरसाट यांना आता कळेल की या शिवसेनेत आणि त्यांच्या शिवसेनेत किती फरक आहे. त्यांना शिवसैनिक म्हणून आम्ही उमेदवारी दिली होती, त्यामुळे ते आज इतक्या मोठ्या पदावर बसले आहे. आमच्याकडे सर्व्हे करुन उमेदवारी दिली जात नाही असा टोला अनिल परब यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
अनिल परब पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून 13 खासदार आणि 50 आमदार सोबत गेले आहेत. त्यांना निवडून आणेल नाही तर राजीनामा देऊन गावाकडे जात शेती करेल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 13 जागा वाचवून तरी दाखवाव्यात त्यानंतर निवडून आणण्याची भाषा करावी, त्यांच्यासोबत गेलेले कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले असून अजून काही ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भावना गवळी, हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर झालेले नाही, तर हेमंत पाटील यांना बदलण्याची चर्चा सुरू आहे असा टोला परबांनी लगावला आहे. 13 जागांसाठी ही परिस्थिती शिंदेंची झाली असून 50 जागांसाठी विधानसभेला काय हाल होतील हे तेव्हा कळेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.