नवी दिल्ली – तब्बल ४३ दिवसांपासून अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी शुक्रवारी आशेचा किरण चमकला. त्यांच्या अंतरिम जामिनाविषयी सुनावणी घेण्याचे सूतोवाच सर्वोच्च न्यायालयाने केले. ती सुनावणी ७ मे यादिवशी होईल.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली. त्यांना सध्या तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
त्यावरील सुनावणीस काही अवधी लागणार आहे. ती बाब ध्यानात घेऊन आणि लोकसभा निवडणुकीचा विचार करून न्यायालयाने अंतरिम जामिनावषियी सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी न्यायालयाने ईडीला तयार राहण्यास सांगितले.
अंतरिम जामिनाविषयी सुनावणी होणार असल्याने केजरीवाल यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऐन निवडणूक काळात त्यांना अटक झाली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील आपची प्रचारमोहीम प्रभावित झाली आहे.
आता केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणार का आणि ते प्रचारात सहभागी होऊ शकणार का या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत.