पवन मावळ {रवी ठाकर} – मावळ तालुक्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी यात्रा, उरूस, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम सुरू आहेत. तसेच निवडणुकीत मतदान करण्यासाठीही अनेकजण गावाकडे येत आहेत.
त्यामुळे तालुक्यातील शहर भागातील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी तासान्तास ताटकळत आहेत. प्रत्येक मार्गावर निघणाऱ्या सर्वच बसेस नेहमी फुल्ल असतात. त्यामुळे एस.टी.ने तातडीने बस वाढवण्याची मागणी होत आहे.
पुणे मुंबईला जोडणारा जुना महामार्ग व द्रुतगती मार्ग हा मावळ तालुक्यातून जातो. राज्याच्या विविध भागातून येणारे प्रवासी आरामदायी प्रवास करतात. मात्र तालुक्यात आल्यावर आपल्या गावात जाताना त्यांना गर्दीमुळे उभे राहूनच प्रवास करावा लागतो. गर्दी वाढल्यामुळे उभे राहून प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त महिला व मुलांची संख्या आहे.
तर अनेक ज्येष्ठ नागरिकसुद्धा एस.टी.मधून उभारून प्रवास करताना दिसतात. यामुळे परिवहन मंडळाने जास्तीत जास्त प्रवाशांना बसून प्रवास करता येईल यासाठी जादा बसेस वाढवण्याची गरज आहे. उभे राहून प्रवास केल्यामुळे अनेक नागरिक वैतागून वडाप तसेच अन्य वाहनांद्वारे प्रवास करण्याचा विचार करतात.
दहावी, बारावीच्या परीक्षेसह इतरही वर्गाच्याही परिक्षा संपल्या आहेत. यामुळे हा गर्दीचा हंगाम असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. तसेच काहीजण आपल्या कुलदैवतालाही जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचा आनंद सोयीस्कर होण्यासाठी एस.टी.ने बसेस जादा सोडण्याचे नियोजन केले आहे. परंतु, फक्त सुट्टयांपुरतेच नव्हे, तर इतरवेळीही प्रवासी बघून बसेस वाढवण्याची गरज आहे.
सवलतींमुळे प्रवासी संख्येत वाढ
शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर ६५ वर्षांवरील प्रवाशांना अर्धे तिकीट आहे. त्याप्रमाणे महिलांनाही प्रवासाकरिता ५० टक्के सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी एसटीतील काही सीट राखीव आहेत. यात्रा व शाळेला लागलेल्या सुट्ट्या यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकांमुळेही चाकरमानी मतदानाकरिता आपल्या गावी येत असल्याने एसटीमध्ये गर्दी दिसून येत आहे.