लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यातही रिक्षा चालविण्यास बंदीच
येरवडा – लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने मीटर डाऊन असल्याने रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने रिक्षा सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी आशा चालकांना होती. परंतु, सरकारने याबाबत निर्णयच जाहीर केला नसल्याने 31 मेंपर्यंत रिक्षा मीटर डाऊनच राहणार आहे. यातून “चाकावरचं पोट’ असणाऱ्या या चालकांचे आर्थिक हाल होणार आहेत.
लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारने रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटनांकडून केली जात आहे.
लॉकडाऊमुळे रिक्षा व्यवसाय बंद आहे. यामुळे चालक आणि त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर होताना रिक्षा चालविण्यास परवानगी मिळेल, असे चालकांना वाटत होते. परंतु, लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने रिक्षा चालकांपुढील अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे आम्हाला ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष आणि कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.