अलिबाग – कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केले आहेत. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या कालावधीमध्ये मासळी व सागरी प्राण्यांचे मोठया प्रमाणात प्रजनन होत असते. तसेच समुद्रात नद्यांव्दारे मोठया प्रमाणात खनिजद्रव्य वाहत जातात. त्याचप्रमाणे क्षारतेचे प्रमाण कमी होते आणि समुद्राच्या तळातील मुलद्रव्ये पाण्याच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठया प्रमाणावर होऊन मासळीच्या लहान जीवांना पोषक वातावरण तयार होते.
परिणामी मासळीच्या साठयाचे जतन होते. त्याशिवाय या कालावधीत वादळी हवामान असल्याने जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यापासून मच्छिमारांचे संरक्षण व्हावे या हेतूने वरील कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे.