मुुंबई – सत्ता असताना 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. गरीबी हटावचे आश्वासन अनेक वर्षे सत्ता भोगूनही पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला.
मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
यादव म्हणाले, बहुमताच्या बळावर मागच्या 10 वर्षांत भाजप-एनडीए सरकारने वेगाने देशाचा विकास आणि देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत. भाजप-एनडीएने 400 जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल 100 वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो.
1950मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत 11 वेळा, इंदिरा गांधींनी 17 वेळा, तर राजीव गांधींच्या राजवटीतच 10 वेळा संविधानात बदल केले गेले होते. तसेच आणीबाणी लागू करून संविधान, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसनेच केले, अशा शब्दांत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
तसेच सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. येत्या मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजप-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.