नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना पिकांच्या हमी भावाबाबत जे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाचा मोदींना का विसर पडला, हरियाणातील महिला कुस्तीपटू भाजप खासदाराने केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आंदोलन करीत असताना मोदींनी त्यांना वाऱ्यावर का सोडले असे प्रश्न विचारत, कॉंग्रेसने आज पंतप्रधान मोदींना त्यांच्या हरियाणा दौऱ्यावरून घेरले आहे. मोदींचा उल्लेख कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी मावळते पंतप्रधान असा केला आहे.
हरियाणातील महिला कुस्तीपटूंच्या निषेधाचा संदर्भ देत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की पंतप्रधानांनी त्यांच्या पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई केली नाही, ज्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वर कायदेशीर हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीचा संदर्भ देत, रमेश यांनी आरोप केला की हरियाणाच्या शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरील विश्वास पुर्णपणे उडाला आहे.
सन २०२१ मध्ये दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन जेव्हा मागे घेण्याचे आवाहन मोदींनी केले होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना किमान हमी भावाची कायदेशीर हमी देण्याचे वचन दिले होते, ज्याचा पुढे मेादींना रितसर विसर पडला. त्यांच्या या विश्वासघातामुळे शेतकऱ्यांना आज पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे ऐकण्याऐवजी मोदी सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या वर्षी हरियाणातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. मोदी सरकार त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष का करत आहे? असा सवालही त्यांनी केला.