पिंपरी – देशातील राष्ट्रपुरुषांनी सर्व समाज उन्नतीसाठी महान कार्य केलेत. ते एका ठराविक जातीचे नव्हते. त्यामुळे त्यांना एका जातीच्या चौकटीत बसवणे योग्य नाही. या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचून आत्मसात केले पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने उल्लेखनिय कार्य करणाऱ्या २१ महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील कै. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाला. या वेळी आमदार उमा खापरे, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, सुरेश भोइर,माजी महापौर अपर्णा डोके, संगीता ताम्हाणे, अश्विनी चिंचवडे, चेतन भुजबळ, शेखर ओव्हाळ, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी १३ वर्षे न्यायालयीन लढा देऊन भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या पुणे महापालिकेच्या विधी विभागाच्या प्रमुख अॅड. निशा चव्हाण, महापालिका उपायुक्त प्रतिभा पाटील व श्वेता दारुणकर यांना यावर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यासह २१ महिलांचा या वेळी गौरव करण्यात आला. या वेळी सत्यशोधक चित्रपट निर्माते आप्पा बोराटे, दिग्दर्शक प्रवीण तायडे आणि सहकलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. हनुमंत माळी यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा केदारी यांनी सूत्रसंचालन केले. महादेव भुजबळ यांनी आभार मानले.