सोमाटणे (ब. रा. पाटील ) – डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका असतो. परिणामी आंब्याला चांगला मोहोर फुटतो. मात्र ऐनवेळी मोहोर फुलण्याच्या वेळेला हवामानात बदल होऊन रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण झाले. यामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या आंब्याच्या मोहोरांच्या अंकुराला जोरदार फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात हा प्रकार दोन वेळा घडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोर गळतीस सुरूवात झाली आहे.
मार्च महिन्यापासून बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होण्यास सुरूवात होते. जून–जुलै पर्यंत आंबा बाजारात असतो. असे असले तरी आंब्याला साधारणः डिसेंबर महिन्यात मोहोर येतो. यंदाही डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर आला. मात्र गेल्या आठवड्यात झालेला हवामानातील बदल आणि झालेला अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या मोहोरावर पाणी साचले.त्यातून करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोहोरच गळून गेल्याने यापुढील काळात आंब्याच झाडाला लागणार नाही. त्यामुळे वर्षभर त्या आंब्याच्या उत्पन्नावर बागाइतदारांची मदार असते तेच पीक हातातून वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंब्यातून ४ पैसे मिळण्याची आशा मावळली आहे. कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे म्हणून पारंपरिक ज्वारी, बाजरी पिके सोडून शेतकऱ्यांचा कल संकरीत आंबा लागवडीकडे वळला आहे. मात्र रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळती बरोबरच करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असुन कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शेतकरी आता सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
कोट : अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे आंब्याच्या मोहोरावर २० टक्के पेक्षा जास्त परिणाम झाला आहे. असे वातावरण राहिल्यास आणखी मोहोर गळतीची भीती वाटते. आमची एकुण ८० झाडे आहेत. त्यामुळे नुकसानही मोठे आहे.
– शैलेश मुऱ्हे, आंबा बागायतदार
कोट : हवामानात अचानक झालेला बदल आणि त्यात पाऊस यामुळे मोहोर गळती होते आणि रोगही मोठ्या प्रमाणावर पडतो. असे दुहेरी नुकसान आंबा उत्पादकांना सहन करावे लागते. शिवाय या हवामान बदलाने आणि अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाने त्याचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
– बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष, संत तुकाराम कारखाना.