पुणे – बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान या चक्रीवादळाने सर्व बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरुवात झाली आहे.कमाल तापमानात ही वाढ होऊन अनेक भागात तापमान हे चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात आज सर्वाधिक तापामान अकोला येथे 44.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.
बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहेत त्यामुळे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश विदर्भात उष्णतेचा पारा वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तापमान चाळिशी पार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड ठरत आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान बहुतांशी ठिकाणी 34 ते 43 अंश तर कोकणात 33 ते 35 अंश मराठवाड्यात 40 ते 43 विदर्भात 40 ते 44 अंशांच्या दरम्यान आहे.