मुंबई – मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नवीन असून त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, करोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय करोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या आहेत.
18 मे रोजीपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातील किती रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले याची आकडेवारी पाहिली तर याची गरज प्रतिपादीत होते. याचाच अर्थ झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत राज्यात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत तर ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण हे जवळजवळ 22 टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.