पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे रेल्वे स्थानक परिसरात स्टॉल व ट्रेन्समध्ये रेल्वेचा अधिकृत पाण्याचा ब्रॅन्ड असलेल्या “रेल नीर’पेक्षा काही खासगी कंपन्यांच्या पाणी बाटल्यांची विक्री होत आहे. त्यामुळे पुण्यात “रेल नीर’चा तुटवडा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, प्रवाशांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रेल्वे प्रशासनाने त्यांचा “रेल नीर’ हा पाण्याचा अधिकृत ब्रॅन्ड तयार केला आहे. त्याची विक्री रेल्वे स्थानक, ट्रेन्समध्ये करणे बंधनकारक केले आहे. या पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रूपये आहे. उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची मागणी वाढत आहे. पण, रेल्वे स्थानकावरील दुकानांमध्ये दर्शनी भागात रेल नीर ऐवजी लोकल कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत. तसेच, प्लॅटफॉर्म व रेल्वेत पाणी विक्रेत्यांकडे देखील दुसऱ्याच ब्रॅन्डच्या पाणी बाटल्या विकताना दिसत आहेत.
या कंपन्या “शुद्ध’ असल्याचे सांगत पाणी विकत आहेत. पण, त्याची कोणतीही तपासणी रेल्वे प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आहे. स्टेशनवरील काही स्टॉलधारक “रेल नीर’ऐवजी खासगी कंपन्यांच्या पाणी बाटल्या विकण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न बुडत आहे. या स्टॉलची तपासणी करण्यासाठी रेल्वेचे निरीक्षक आहेत. पण, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रेल्वे स्थानकावरील स्टॉल व परिसरात “रेल नीर’च्या पाण्याच्या बाटल्या विकणे बंधनकारक आहे. सध्या पुण्याला ८०० ते ९०० बॉक्स “रेल नीर’ येते. या पाण्याचा तुटवडा असल्याच्या तक्रारी आलेल्या आमच्याकडे आलेल्या नाहीत.
गिरीराज सोना, आयआरसीटीसी व्यवस्थापक, पुणे विभाग