मुंबई: राज्यात कोरोनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात्याच मुंबई आणि पुण्यात तर कहर होताना पाहायला मिळत आहे.दरम्यान, मुंबईमध्ये कालच्या दिवसभरात तब्बल १३८२ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली. तर गुरुवारी ४२ करोनाबाधित मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत ८८२ करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतोच आहे. करोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक व विलगीकरणात ठेवलेल्यांना जेवणाचा पुरवठा करणारे पालिका कर्मचारीही करोनाबाधित होऊ लागले आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ७७७ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २२ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर गुरुवारी एक हजार ३८२ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालावरुन उघड झाले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली आहे. गुरुवारी ४२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला .
पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाअंतर्गत येणाऱ्या धारावी, दादर आणि माहीम परिसरातील करोनाबाधित रुग्ण संख्या गुरुवारी १८८० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या धारावीमध्ये आहे. गुरुवारी दिवसभरात ४७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली आहे.