सातारा – रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कायम सत्तेचे विकेंद्रीकरण आणि कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून उपेक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र, त्यांच्या पश्चात संस्थेची वाटचाल नेमकी उलट पद्धतीने सुरू आहे. काही मूठभर लोकांच्या हाती संस्थेची सूत्र गेली असून ज्यांचे संस्थेच्या वाटचालीत योगदान नाही, अशा लोकांना कार्यकारिणीवर संधी मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे प्राध्यापकांवर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची सणसणीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. काही लोक सोयीस्कर राजकारण करतात, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता यावेळी लगावला.
कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी आंदोलक प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले, “”संस्थेच्या वाटचालीमध्ये गांधीवादी विचारसरणीप्रमाणे सोयीस्कररित्या काही तत्वे सांगितली जातात. रयतच्या घटनेप्रमाणे मुख्यमंत्री हा या संस्थेचा अध्यक्ष असावा असे नमूद आहे. जेणेकरून उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत आणि त्यांना आर्थिक जीवनमान उंचावण्याची संधी मिळावी.”
आता रयत शिक्षण संस्थेच्या चाव्या काही मूठभर लोकांच्या हाती गेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत सातारच्या राजघराण्याचे मोठे योगदान आहे. आम्ही यांना वारंवार मागणी करुनही त्यांनी राजघराण्यातील कोणत्याही सदस्यांना कार्यकारिणीवर घेतले नाही. उलट ज्यांचे संस्थेच्या उभारणीत कोणतेही योगदान नाही अशा लोकांना मात्र येथे संधी मिळाली आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेची सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात उलट वाटचाल सुरू आहे हे अत्यंत चुकीचे आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये चुकीची धोरणे राबवली जात असल्यामुळेच प्राध्यापकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. काही लोक सोयीस्कर राजकारण करतात आणि सोयीस्कर सत्तास्थाने राबवून घेतात, असा टोला उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.