सातारा – इतर बॅंकांना तारण दिलेली जमीन स्टेट बॅंक ऑफ इंडियास तारण देत 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणेंसह पाचजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार बॅंकेच्यावतीने संदीपराव कांबळे (रा. पिरवाडी) यांनी नोंदवली आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या गोडोली शाखेत व्यवस्थापक म्हणून संदीप कांबळे हे कार्यरत आहेत. त्यांच्याशी 2014 मध्ये दिगंबर आगवणे यांनी संपर्क साधला होता. त्यांनी व्यवसाय वाढीसाठी कर्ज आवश्यक असल्याचे सांगत त्यासाठी फलटण येथील पिंपळवाडी मधील 40 गुंठे जागा तारण देण्यास तयार असल्याचे सांगितले. यानुसार स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आगवणे यांना तारणापोटी 1 कोटी 15 लाखांचे कर्ज दिले. यानंतरच्य काळात पिंपळवाडी येथील जागा दिगंबर आगवणे यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ इंडिया यांना तारण देत त्यांच्याकडूनही कर्ज घेतल्याचे स्टेट बॅंकेच्या निदर्शनास आले.
आगवणे यांनी ही गोष्ट लपवून ठेवत विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बॅंकेच्यावतीने काल सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यात आगवणे व इतरांनी बॅंकेची 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याचे नमुद केले आहे. यानुसार दिगंबर रोहिदास आगवणे, जयश्री दिगंबर आगवणे, रोहिदास नामदेव आगवणे, सत्यवान धर्मराज आगवणे, भिमराव गुलाबराव माने (सर्व रा. गिरवी, फलटण) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत.