मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये १ मे रोजी नियोजित असलेल्या सभेवरून राज्यात सध्या सत्ताधारी विरुद्ध मनसे असे युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत औरंगाबाद पोलिसांनी या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे सभा घेण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा डिवचले आहे.
संदीप देशपांडे यांनी आज सकाळी मनसेने १ मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला pic.twitter.com/wyab4vitrZ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 27, 2022
मनसेची औरंगाबादला सभा होणारच अशी ठाम भूमिका या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच “राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला”, असा खोचक टोला ठाकरे सरकारला लगावला आहे. मनसेने सभेबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे सांगण्यात आले होते मात्र औरंगाबाद पोलिसांनी हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेविषयीदेखील भाष्य केले. “राज ठाकरे यांच्या मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात येईल,” असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले होते.