पळसदेव -भावडी (ता. इंदापूर) गावाची अगदी जेमतेम दीड हजार ते अठराशे लोकसंख्या असलेल्या गावात सध्या गटार तसेच विविध समस्या असल्याचे दिसून येत आहे. गावात अगदी सर्वच रस्त्यालगत गटारीचे व सांडपाणी वाहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
उजनी काठावरील गाव असल्याने बहुतेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. गावातील रस्त्याच्या कडेलाच अगदी रस्त्याच्या साइडपट्ट्यांवर शेण व घरातील कचरा टाकून उकिरडे बनवतात. त्यामुळे गावातील वातावरण खराब झाले आहे.
अनेक नागरिकांच्या दारातून गटारीचे पाणी दररोज वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याबाबत प्रशासनाचे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गावात सांडपाणी साठत असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय गावातील अगदी कुपनलिका शेजारी देखील काही नागरिकांनी उकिरडे टाकले आहेत. त्यामुळे कुपनलिकेचे पाणी नागरिकांना नव्हे तर जनावरांनादेखील पिण्यासाठी सध्या नागरिक वापर करीत नाहीत.
गावातील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या उकिरड्याबाबत नागरिकांना अनेकवेळा सूचना केल्या आहेत. मात्र नागरिक ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करत नाहीत. शिवाय ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे मोठे साधन नाही. गावात गटार योजना नसल्याने नागरिक रस्त्यावरच सांडपाणी सोडत आहेत. यामधून गावात रोगराई वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंदिस्त गटार योजनेस निधी मिळाल्यास हे चित्र बदलण्यास मदत होईल.
-उत्तम काळे, ग्रामपंचायत सदस्य, भावडी