मानवी वस्तीत सुरक्षित वाटत असल्याने गावागावांत मुक्तपणे बागडताहेत
राजगुरूनगर -“नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा’ हे गीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते; मात्र अनेकांना मोर प्रत्यक्षपणे पाहता येत नाही. याला अपवाद म्हणजे खेड तालुका आहे. खेड तालुक्यात काही भागामध्ये मोरांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळात मोरांचे स्थानिक ग्रामस्थांकडून संरक्षण केले जात आहे. तर त्यांना अन्न आणि पाणी पुरविण्यात येत असल्याने मोर आता गावागावात भीती न बाळगता बागडताना दिसत आहे.
अलीकडच्या काळात जंगल कमी कमी होत चालले असताना जंगलातील प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिबटे, शेकरू, हरण, भेकर, काळवीट, गवा कोल्हे, तरस, लांडगे, मोर, ससे घुबड, साळींदर, माकड, यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. जंगलात वन्य प्राण्यांना खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांच्या संख्येत लक्षणीय घाट होत चालली आहे.
मोराला मानवी वस्ती सुरक्षित झाली असून त्यांच्या अन्न पाण्याची सोय झाल्याने त्याचे वास्तव्य वाढले आहे. खेड तालुक्यात सुमारे 50 गावांमध्ये वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे. जंगलाचे संवर्धन व संरक्षण केले जात आहे. मोर आणि इतर प्राणी पक्षांना काही ठिकाणी पाणवठे तयार केले असल्याने त्यांचे वास्तव्य याच ठिकाणी निर्माण झाले आहेत. खरपुडी खुर्द, रेटवडी, रानमळा, दरकवाडी, तिन्हेवाडी, जैदवाडी आदी गावांमध्ये मोरांची मोठी संख्या निर्माण झाली आहे.
तालुक्यात आठ ते दहा गावांमध्ये मोरांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला कायद्याने संरक्षण मिळाल्याने त्याची शिकार होत नाही. यामुळे त्याच्या संख्येत वाढ झाली आहे, राजगुरूनगर शहरानजीक असलेल्या वनविभागाच्या जंगलात त्यांची संख्या मोठी आहे. संख्या वाढल्याने वनविभागाच्या माध्यमातून त्यांना अन्न पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे; मात्र धान्य देणाऱ्या दानशूरांनी वनविभागाकडे धान्य व पाण्यासाठी मदत करावी.
-आशुतोष शेंडगे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, खेड