राज्यातील स्थिती : तब्बल पंधरा हजार कर्मचारी बेरोजगार
पुणे – गेल्या दोन वर्षांत राज्यातील तब्बल 317 उद्योग-कारखाने बंद पडले असून, त्यामुळे समारे पंधरा हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच याबाबत कबुली दिली आहे.
राज्यातील किती कारखाने बंद पडले आहेत, याबाबत विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांच्या प्रश्नावर देसाई यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, “2007 च्या गणनेनुसार राज्यात उद्योगांची संख्या 37 हजार 753 इतकी आहे. त्यानंतर औद्योगिक गणना झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत तब्बल 317 कारखाने बंद पडले असून, त्यातून सुमारे 14 हजार 787 कामगार बाधित झाले आहेत. जे कारखाने कामगार आणि व्यवस्थापन यांच्या वादामुळे बंद पडले आहेत, तेथे कामगार आयुक्तांच्या माध्यमातून तडजोडीचे प्रयत्न केले आहेत. विशेष अभय योजना आणि बंद पडलेल्या उपक्रमाच्या जमिनी मुक्त करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यातून गुंतवणूक व रोजगार वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल,’ असेही देसाई म्हणाले.