उदयपूर : राजस्थानातील प्रतापगढ जिल्ह्यातील जोलार गावा देवीचे एक अनोखे मंदिर आहे. त्याठिकाणी दर्शनासाठी जाणारे भाविक देवीला सौभाग्याच्या साहित्याबरोबरच, नेवेद्य आणि बेड्यादेखील अर्पण करतात. या मंदिराच्या आवारात 200 वर्षे जुने त्रिशूल रोवण्यात आलेले आहे. या त्रिशुलासमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून लोक त्याठिकाणी बेड्या अर्पण करतात. राजस्थानातील अरवली पर्वतरांगेतील दाट जंगलात असलेल्या उंच डोंगरावर हे दिवाक माता मंदिर आहे.
प्रतापगढ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोलार गावाच्या हद्दीत हे मंदिर आहे. या ठिकाणी येणारे भाविक दिवाक माता प्रसन्न व्हावी म्हणून वेगवेगळे नवस बोलतात. त्यावेळी देवीला सौभाग्याच्या साहित्याबरोबरच बेड्याही अर्पण केल्या जातात. या बेड्या ज्या त्रिशुलावर अर्पण केल्या जातात त्यामागे एक रंजक कथा आहे. असे सांगितले जाते की शंभर-दोनशे वर्षांपूर्वी माळवा-मेवाड भागात डाकुंचे साम्राज्य होते.
गुन्हे केल्यावर डाकू याठिकाणी येत असत आणि देवीला नवस करत असत की पोलिसांच्या तावडीत सापडल्यास सुटका झाल्यावर इथे येऊन तुला बेड्या अर्पण करेल. त्यानुसार पोलिसांनी पकडल्यावर सुटका होताच ते इथे येत असत आणि बेड्या अर्पण करत असत. ही प्रथा पुढे चालू राहिली आणि मग लोक आपली दुःखाच्या बेडीतून सुटका व्हावी असा नवस बोलून इच्छापूर्ती झाल्यास बेडी अर्पण करण्याचा नवस बोलू लागले. आता मंदिराच्या आवारात असलेल्या 200 वर्षे जुन्या त्रिशुलाकडे लोक नवस बोलतात आणि त्याठिकाणीच बेड्या अर्पण करतात.
या मंदिराच्या परिसरात चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. लहानमोठ्या डोंगररांगांमधील या मंदिरात पायी जावे लागते. दिवाक मातेवरील श्रद्धेपोटी या परिसरातील एका झाड तोडले जात नाही. त्यामुळे हा परिसर हिरवागार आणि रमणीय आहे.