सातारा – मंडल आयोगामुळे मराठा समाज इतर समाजांपासून बाजूला पडला. सर्व समाजाला एकत्र ठेवण्याची अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून होती; परंतु त्यांनीच मंडल आयोगाला पाठिंबा देऊन टाकला. आता मराठा समाजातील सर्व जण एकत्र आल्याशिवाय समाजापुढील प्रश्न सुटणार नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक शशिकांत पवार यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिर येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पवार म्हणाले, मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लढत आहोत. ज्येष्ठ नेते, दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी क्षत्रिय मराठा समाजाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत मीदेखील मराठाच नव्हे तर सर्व समाजांच्या हितासाठी लढत होतो. आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जावे, असा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाने केला होता; परंतु मंडल आयोगाच्या अहवालात या बाबीचा उल्लेख नव्हता. मराठा समाजाला बाजूला ठेवून मंडल आयोगाने शिफारशी केल्या होत्या. या आयोगाला वसंतदादा पाटील यांनी विरोध केला होता, तर शरद पवार यांनी आयोगाच्या बाजूने कौल दिला होता.
मंडल आयोग हा मराठा समाजाला इतर समाजापासून दूर करणारा असल्याने त्यात शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी विनंती वारंवार करूनदेखील त्यांनी दुर्लक्ष केले. या आयोगाच्या शिफारशी मराठा समाजासाठी कशा अन्यायकारक आहेत, याचे विवेचन मी एका पुस्तिकेत केले आहे. पवारांनी केलेल्या दुर्लक्षाला राजकीय कारण असू शकते; परंतु अन्याय झालेला मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला आहे. मोठा लढा देऊन संयुक्त महाराष्ट्र कशासाठी मिळवला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजकीय नेते घडीघडीला बदलतात. आम्ही त्यातले नाही. जे आहे, ते समाजाच्या हितासाठी मांडतो. आता सर्व समाज एकत्र आला नाही तर महाराष्ट्र एकसंध राहणार नाही.
आरक्षणाच्या विषयाला फाटे फोडू नका : उदयनराजे
महाराष्ट्रात जे आमदार आहेत, त्यांचे मतदार मराठा समाजाचेदेखील आहेत, हे त्यांनी विसरू नये. सर्वांनी एकत्र येऊन मागणी केल्याशिवाय मराठा समाजावरील अन्याय दूर होणार नाही. आता फाटे फोडत बसू नका. तुकडे होण्यापासून महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर स्वार्थी राजकारण्यांना बाजूला केले पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्याचा आहे. त्यासाठी केंद्राकडे बोट कशाला दाखवता, असा सवाल खा. उदयनराजे यांनी केला.