नगर – ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसुल विभागासह कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात 1 हजार 583 गावातील 6 लाख 36 हजार 146 शेतकऱ्यांच्या 4 लाख 54 हजार 12. 58 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान तब्बल 475 कोटी 10 लाख 50 हजार रुपयापर्यंत गेले आहे.
सरकार अद्यापही स्थापन न झाल्याने मदतीचा अध्यादेश कधी निघणार, अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली असून रब्बीची पेरणीबाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.काढणीसाठी आलेले पिक हातातून गेल्याने शेतकरी निराश झाला. अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठले असल्याने त्यांना रब्बीच्या पेरणीसाठी वाफसा मिळालेला नाही. महसुल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात तब्बल 4 लाख 54 हजार 12.58 हेक्टर क्षेत्र या अवकाळीमुळे बाधित झाले आहे. सर्वाधिक फटका कापूस, बाजरी सोयाबीन यासह फळबागांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाने हेक्टरी नुकसानीबरोबर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रक्कमेनुसार आज आकडेवारी जाहीर केली असून त्यात 475 कोटी 10 लाख 50 हजार एवढा आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळू शकते. 33 टक्क्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्राची माहिती आज प्रशासनाने शासनाला पाठविली आहे.
जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 6 हजार 800, बागायत क्षेत्रासाठी 13 हजार 500 ते फळबागासाठी 18 हजार प्रमाणे मदत शासनाकडून देण्यात येते. त्यानुसार प्रशासनाने नुकसानीची रकम निश्चित केली आहे. सर्वाधिक कापसाचे 52 हजार 600 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल बाजरीचे 50 हजार 116 हेक्टर, सोयाबीन 70 हजार 670 हेक्टर, ज्वारी- 17 हजार 799, मका- 10 हजार 246, भात- 12 हजार 400, ऊस 600, कांदा- 10 हजार 569.49, केळी- 320, डाळींब- 13 हजार 200 याप्रमाणे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
जिरायतमध्ये 2 लाख 87 हजार 946 शेतकऱ्यांचे 2 लाख 16 हजार 587. 70 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 147 कोटी 27 लाख 96 हजार. बागायतमध्ये 3 लाख 24 हजार 521 शेतकऱ्यांचे 2 लाख 21 हजार 198.61 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 298 कोटी 61 लाख 81 हजार तर फळबागामध्ये 23 हजार 679 शेतकऱ्यांचे 16 हजार 226.27 हेक्टर क्षेत्रातील 29 कोटी 20 लाख 73 हजार याप्रमाणे नुकसान झाले आहे.