रायबरेली – देशातील जनतेला बदल हवायं. खोटे बोलण्याला आणि राजकीय स्तरावरील चर्चेने गाठलेल्या पातळीला आता जनता विटली आहे, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रियंका यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. कॉंग्रेस सत्तेत आल्यास संपत्तीचे फेरवाटप करेल यांसारखे मुद्दे भाजप आणि मोदींनी प्रचारावेळी लावून धरले आहेत. त्याविषयीच्या प्रश्नावर प्रियंका यांनी मोदींना थेट आव्हान दिले.
देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वांत वाईट स्थिती गाठली आहे. त्याविषयी मोदींनी बोलावे. महागाई कशी कमी करणार ते सांगावे. शेतकऱ्यांना कशी मदत करणार ते स्पष्ट करावे. भाजपने कुठल्या संस्था उभारल्या ते नमूद करावे, असे त्या म्हणाल्या.
मोदी त्यांच्या भाषणांमध्ये कल्पनाशक्तीचा अधिक वापर करत असल्याचे जाणवते. वास्तव मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. कॉंग्रेस सत्तेत आल्यास जनतेचे दागदागिनेच नव्हे; तर म्हशीही हिरावल्या जातील असे ते म्हणत आहेत.
पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर कुणी तसे बोलले असते तर आम्ही हसलो असतो. पण, पंतप्रधानच तसे म्हणत असल्याने आम्ही हसूही शकत नाही, अशी मिश्कील आणि उपहासात्मक टिप्पणी प्रियंका यांनी केली.
भाजपला राज्यघटनेत बदल करायचा असल्याचा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे. त्याविषयी प्रियंका यांनी भूमिका मांडली. जनतेने भाजपला ४०० जागांवर विजयी केल्यास राज्यघटनेत बदल करण्याची जाहीर ग्वाही त्या पक्षाचेच नेते देत आहेत.
त्यामुळे कॉंग्रेसने तो मुद्दा हिरिरीने लावून धरला आहे. राज्यघटनेने जनतेला मताधिकार दिला आहे. आरक्षणाचा हक्क राज्यघटनेने मिळवून दिला आहे. राज्यघटनेमुळेच देशातील लोकशाही सशक्त बनली आहे. त्यामुळे आम्ही भाजपला राज्यघटनेत बदल करू देणार नाही. तसेच, जनतेचे हक्क दुबळे होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या.