मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही प्रचाराच्या मैदानात कंबर कसून उतरले असल्याचे दिसत आहे. त्यातच सर्वच पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना दिसत आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पहिली सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शंभर कोल्हे जरी एकत्र आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
शेर का शिकार नहीं होता! pic.twitter.com/2RqcWQx9fJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2019
आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उभे करा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले. तसेच माझ्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, अशा पळपुटांना आमच्या विरोधात का उभे करता?, असा सवालदेखील फडणवीस यांनी यावेळी केला. कोल्हे जरी एकत्र आले तरी ते सिंहाची शिकार करू शकणार नाही, असे म्हणत त्यांनी आशिष देशमुख यांनाही टोला लगावला.
आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने दिली. त्याचं काम अद्यापही सुरू आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शेतकरी हिताच्या अनेक योजना सरकारने राबवल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 5 वर्षांमध्ये 50 हजार कोटींची विकासकामे करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पही पूर्णत्वास नेण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलो आहोत. परंतु या निवडणुकीत मजाच येत नाही. लहान मुलाला देखील या निवडणुकीचा निकाल काय येईल याची कल्पना आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हताश आणि निराश आहेत. आमच्या विरोधात त्यांनी उमेदवारही उतरवले नाहीत, असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.