मुंबई – लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी समाप्त झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील ५ जागांसाठी ९७ उमेदवार रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या ५ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिलला मतदान होईल. त्या मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केलेल्या १३ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली.
नागपूरमध्ये २६, चंद्रपूरमध्ये १५, रामटेकमध्ये २८, भंडारा-गोंदियामध्ये १८, तर गडचिरोलीत १० उमेदवार नशीब आजमावतील. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे सर्व मतदारसंघ विदर्भातील आहेत.
रामटेक वगळता इतर ४ मतदारसंघांमध्ये भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुख्य लढत अपेक्षित आहे. रामटेकमध्ये कॉंग्रेसचे श्याम बर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे आमनेसामने आहेत.
नागपूरमध्ये गडकरी यांच्या विरोधात कॉंग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरूद्ध कॉंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर असा मुकाबला होईल.
गडचिरोलीत भाजपचे खासदार अशोक नेते विरूद्ध कॉंग्रेसचे नामदेव किरसान आणि भंडारा-गोंदियात भाजपचे खासदार सुनील मेंढे विरूद्ध कॉंग्रेसचे प्रशांत पडोळे अशा लढती रंगतील.