मुंबई – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत 14 निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला तर अनेक जण बाधित झाले. ही दुर्घटना उष्माघाताने झाल्याचे पहिल्यांदा सांगितले जात होते. मात्र या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून तसेच समाजमाध्यमं, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, उपस्थित अनुयायी सात तास अन्न-पाण्याशिवाय होते, कार्यक्रमाचे आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. तरी या घटनेमागचे सत्य बाहेर येण्यासाठी या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे मा. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
त्यामुळे एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. तथापि, ती न झाल्यामुळे 14 अनुयांयाचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे, सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जखमी अनुयांयावर मोफत उपचार करुन त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशा मागण्या अजित पवार यांनी दि. 17 एप्रिल, 2023 रोजीच्या पत्रान्वये सरकारकडे केल्या होत्या. मात्र, एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नसल्याने सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मा. राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.