नवी दिल्ली : देशात सध्या समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकाणावर न्यायालय काय निर्णय देणार हे काही दिवसात समोर येईल, परंतु, या अगोदरच टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी समलैंगिक विवाहाच्या समर्थनार्थ एक मोठे वक्तव्य केले आहे.
टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी समलैंगिक विवाहाच्या समर्थनार्थ भाष्य करताना, ‘प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. या प्रकरणावरून अभिषेक यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. पुढे बोलताना अभिषेक म्हणाले, केंद्र सरकार जाणूनबुजून हे प्रकरण लटकवत आहे. मला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, पण माझा विश्वास आहे की प्रत्येकाला जीवनसाथी निवडण्याचा, प्रेम करण्याचा अधिकार आहे. प्रेमाला कोणताही धर्म किंवा जात नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ‘जर मी पुरुष आहे तर मला पुरुष आवडतो, जर मी एक स्त्री आहे, तर मला एक स्त्री आवडते. प्रेमाला कोणतीही सीमा नसते. प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मग, तो स्त्री असो वा पुरुष.’ असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं सांगितलं की, ‘ते विधिमंडळाच्या कक्षेत येतं आणि या निर्णयाचा समाज, परंपरा आणि विद्यमान कायद्यांवर परिणाम होईल या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुनावणीत पक्षकार बनवून त्यांचं मतही न्यायालयानं ऐकून घेतलं पाहिजे.’