राज्यांवरच निर्णय; अंतिम वर्षाबाबत मनुष्यबळ विकास मंत्र्यांचे स्पष्टीकरण
पुणे – देशातील विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची होणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले. त्यामुळे अंतिम वर्ष अथवा सत्राच्या परीक्षेवरून केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
नॅशनल असेसमेंट ऍन्ड ऍक्रिडिएशन कौन्सिल, बंगळुरू (नॅक) यांच्यातर्फे “करोनानंतर उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर निशंक बोलत होते. पोखरियाल यांनी देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाता, प्राध्यापक, प्राचार्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी उच्च शिक्षणासंदर्भात आढावा घेत करोनानंतर शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचे सूचित केले.
निशंक म्हणाले, “संबंधित राज्यातील करोनाची स्थिती पाहता तेथील राज्य सरकार व विद्यापीठांनी परीक्षेसंदर्भात योग्य तो विचार करावा.’ त्यामुळे विद्यापीठांना परीक्षेचे नियोजन आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
याउलट राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच बहुतांश विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा घेऊच नये, असेच म्हणणे आहे. मात्र, खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परीक्षेसंदर्भात लवकरात लवकरच निर्णय घेण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यावरून आता परीक्षा होणार की नाही, असा संभ्रमात विद्यार्थी आहेत.
मुख्यमंत्रीही मैदानात
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरूंशी शनिवारी (दि.30) दुपारी साडेबारा वाजता ऑनलाइनद्वारे चर्चा करणार आहेत. त्यामळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून लवकरच ठोस निर्णय होण्याची चिन्हे आहेत.