पारनेर -तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराने योजनेचा जलस्रोत असलेल्या बारवेतच दूषित पाणी सोडले आहे, त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कुकडी कालव्या शेजारी असणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा करून ते थेट पिंपरी जलसेन गावात पाईपलाईन व गावातून प्रत्येक वाडी-वस्तीवर देण्यासाठी नळ योजनेसाठी शासनाने सुमारे 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. प्रत्यक्षात काम सुरू झाले. काम काही अशी पूर्ण झाल्यावर लगेच लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण होऊन जवळपास चार महिने होत आले असून, योजना कार्यान्वित झाली नव्हती. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी व उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी शासनाने हा निधी दिला असताना देखील प्रत्यक्षात नागरिकांची पाण्यासाठीची पायपीट थांबली नाही.
मात्र ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार खडबडून जागा झाला. त्यानंतर लगेच पाणी योजना सुरू करण्यासाठी घाई करण्यात आली. निघोज येथील कुकडी कालव्या जवळ असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतून हे पाणी पिंपरी जलसेन येथील बारवेत सोडण्यात आले. मुळात अनेक वर्षांपासून या विहिरीतून पाणी उपसा न झाल्याने या पाण्यास दुर्गंधी येत आहे. मात्र ठेकेदाराने हेच पाणी पिण्याच्या बारवेत सोडले आहे.
गेल्या आठवड्यात पिंपरी जलसेन येथे कोरोनामुळे एका जावयाचा मृत्यू झाल्यानंतर उपाययोजना म्हणून गाव सील करण्यात आले आहे. त्यात दूषित पाणी पिण्याच्या बारवेत सोडल्यानंतर ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मुळात हे पाणी सुरू केल्यानंतर पाईपलाईन व पाण्याची चाचणी घेण्यासाठी हे पाणी बारवे शेजारील असणाऱ्या बंधाऱ्यात अथवा जुन्या बारवेत सोडणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता ठेकेदाराने हे पाणी पिण्याच्या पाण्यात सोडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी ः पानमंद
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, लोखंडी अथवा पीव्हीसी पाईप वापरण्या ऐवजी साधे काळे पाईप काही ठिकाणी वापरण्यात आले आहे. कामात अनियमितता असून, या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच दौलत पानमंद यांनी केली आहे.
अधिकृत वीजजोड नाही?
ग्रामपंचायतीकडून अनधिकृत वीजकनेक्शन नसल्यामुळे योजना सुरू करण्यासाठी उशीर होत असल्याचा निर्वाळा ठेकेदाराकडून देण्यात येत आहे. त्या विहिरीवरील जुन्या मोटरचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणकडून वीजकनेक्शन खंडित केले आहे. अधिकृत वीजकनेक्शन व पूर्ण दाबाने वीजपुरवठा झाल्यास ही योजना सुरळीत होणार आहे. त्यामुळे पिंपरी जलसेन ग्रामपंचायतीने थकीत वीजबिल भरून ही योजना सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.