कोपरगाव -राज्याचे कृषीमंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सन 2020 च्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधून केलेल्या मागण्यांना कृषी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांनी गुरुवारी (दि.28 ) खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडतांना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सांगून या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली.यामध्ये प्रामुख्याने कोपरगाव तालुक्यात पाच मंडलामध्ये पाच स्वयंचलीत हवामान केंद्र आहे.
ही संख्या कमी असल्यामुळे पिक विम्याचे निकष लावतांना अडचणी निर्माण होवून अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे, त्यासाठी कोपरगाव तालुक्यात नवीन 20 स्वयंचलित हवामान केंद्रे मिळावी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पेरू, डाळींब, चिक्कू आदी फळांची कलमे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून दयावी, करोनाच्या संकटात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची द्राक्ष, चिक्कू आदी नाशवंत फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या फळांच्या उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, जलसंधारण योजनेंतर्गत नाला खोलीकरण व गाळ काढणे कामासाठी शासनाकडून निधी मिळावा, कृषी यांत्रीकीकारण योजनेमध्ये 2019-20 प्राप्त अर्जाच्या तुलनेत ट्रॅक्टर व कृषी औजारांचा लक्षांक कमी असून तो सन 2020-21 मध्ये लक्षांक वाढवून मिळावा.
फलोत्पादन विकास योजनेंतर्गत कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण 2019-20 मध्ये प्राप्त अर्जाच्या तुलनेत लक्षांक कमी असून तो सन 2020-21 मध्ये वाढवून मिळावा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे सन 2019-20 चे थकीत असलेले अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे व सन 2020- 21 करीता नवीन अर्ज स्विकारण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरु करावी, मागेल त्याला शेततळे, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण या योजनांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु करावे तसेच सन 2019-20 मध्ये शेततळे, कांदाचाळ व अस्तरीकरण केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्याना तातडीने मिळावे, महाबीज मार्फत पुरवठा होणारे बियाणे अनुदानावर उपलब्ध व्हावे आदी मागण्या आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत कृषिमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केल्या असून या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.