मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले. त्यासोबतच पक्षातील इतर काही ज्येष्ठ नेत्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. मात्र, या सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावरुन तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
सामानाच्या अग्रलेखातून अजित पवारांना डिवचले आहे. यात अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले., असे म्हटले आहे.
अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल.असे सांगण्यात आले आहे.
पुढे अग्रलेखात, ‘राजकारणातल्या विश्वासार्हतेला सध्या कमालीची घरघर लागली आहे. सकाळी या पक्षात असलेला नेता संध्याकाळी कोठे विलीन झालेला असेल ते सांगता येत नाही. काही लोक यास राजकीय बुद्धिबळाचा पट समजतात. उंट तिरका चालतो, पण या पटावर त्यास घोडय़ाप्रमाणे अडीच घरेही जबरदस्तीने चालवले जाते. अशा प्रकारच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके तेच घडत आहे.असे म्हणत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचले आहे.
त्यासोबतच “याच राजकारणात शरद पवार व त्यांचा पक्ष हे एक महत्त्वाचे घटक आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल व त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. “असे मत ठाकरे गटाने मांडले आहे.