पुण्या-मुंबईसह सात जिल्ह्यांवरच करोनावरील मात अवलंबून
नवी दिल्ली – देशातील करोना विरोधातील लढ्याचे यश हे मुंबई, पुण्यासह सात जिल्ह्यांमध्ये प्रसार होणाऱ्या करोनाला रोखण्यावर अवलंबून असेल. करोनाचा प्रभाव असणारी अशी 15 धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.
या 15 पैकी सात जिल्ह्यातील स्थिती तर भयावह आहे. त्यामध्ये अनुक्रमे हैदराबाद, पुणे, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीचा समावेश आहे. त्याच बरोबर करोनाबाधितांची सर्वाधिक रुग्ण आढळल्याने चिंताजनक स्थिती असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बडोदा, कूर्नुल, भोपाळ, जोधपूर, आग्रा, ठाणे, चेन्नई आणि सुरत यांचा समावेश आहे.
करोनाच्या लढ्यात या 15 जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक आहे. तर त्यातील सात जिल्ह्यात विशेष गंभीर स्थिती आहे. या भागातील यशावरच देशातील करोनाच्या लढाईचे यश अवलंबून आहे. आम्ही सक्रियपणे देखरेख, चाचणी आणि उपचार करत आहोत. आपल्याला तेथे जिंकावंच लागेल, असे ट्विट कांत यांनी केले आहे. करोना विरोधातील उच्चाधिकार गटांचेही कांत हे प्रमुख आहेत.