टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे मामा-भाच्यात वाद होवून मामाने विषारी औषध प्राशन केले तर भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) 4 ते 5 च्यादरम्यान घडली.याबाबतची सविस्तर माहीती अशी, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय 30) व त्यांचा भाचा पंकज चव्हाण (वय 22) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. खंडागळे यांनी त्यांच्या बहिणीला काही जमिन दिलेली आहे.त्यामुळे मामा- भाचे शेती करतात.
सोमवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान शेतात काम करत असताने मामा भाच्यात कुठल्यातरी कारणाने वाद झाला. त्यामुळे मामा नवनाथ खंडागळे यांनी पिकावर फवारणीसाठी आणलेले विषारी किटकनाशक प्राशन केले. मामाने किटकनाशक पिल्याचे पाहून घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या 70 फूट खोलीच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जावून तातडीने नवनाथ खंडागळे यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
विहिरीत उडी मारलेल्या भाच्याचा विहिरीत तपास सुरू करण्यात आला. मात्र अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा आल्याने मंगळवारी (दि.28) सकाळी पोहण्यात पटाईत असलेले रावसाहेब बनकर यांनी विहिरीतून गळाच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. किटकनाशक पिलेल्या खंडागळे यांची प्रकृती ठीक असल्याचे समजले आहे. या घटनेमुळे टाकळीभानमध्ये खळबळ उडाली आहे. मामा भाच्यात वाद कशामुळे झाला हे समजू शकले नाही. टाकळीभान पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रविंद्र पवार, पोलिस नाईक गोरे, सहाय्यक बाबा सय्यद यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविला आहे. याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.