Amol Kolhe : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. यादरम्यान अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. “वाघ जंगलात फिरताना आपल्याला तो राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टच्या इशाऱ्यावर कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात,” असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला होता. अमोल कोल्हे यांच्या या टिकेला अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, “सर्कशीतला वाघ आणि जंगलातला वाघ कोण आहे? हे बारामतीकरांना माहित आहे. आपण चार वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत. अमोल कोल्हेंसारख्या अतिसामान्य व्यक्तीला शिरूरमध्ये निवडणूक लढायला लावत अजित पवारांनी वाघ बनवलं. आता अमोल कोल्हेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांची सर्कशीतील वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोल्हेंच्या उत्तुंग बुद्धिमत्तेवर हसावं वाटतं. कोण सर्कशीतलं आणि कोण जंगलातलं हे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत माहिती आहे.”
पुढे अमोल मिटकरी म्हणाले, “अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना संघर्ष यात्रा काढावी लागत असेल, तर हेच अजित पवारांचं वेगळेपण आहे. अजित पवारांनी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना कामावं लावलं आहे. अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या. बारामतीची लोक फार हुशार आहेत. येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे, हे बारामतीची लोकांना माहिती आहे.” अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना थोडं सबुरीने घेतलं पाहिजे,” असा इशाराही अमोल मिटकरींनी यावेळी दिला आहे.