करोनाविरोधात लढा : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये करोनाची भीती वाढली
पवनानगर – जगभरात करोना (कोविड -19) या आजाराने थैमान घातले आहे. या रोगामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर ग्रामीण भागामध्ये बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी कोणतीही नियमावली आखण्यात आली नाही. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबई, पुणे येथील नागरिक घरी येत आहेत. या नागरिकांचा व्यवस्थित “बंदोबस्त’ केला जात नाही, अशी ओरड समोर आली आहे.
मावळ तालुक्यासह पवनमावळ परिसरात रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण अशा भागातून अनेक नागरिक आले आहेत. शहरातून ग्रामीण भागातील नातेवाईक किंवा मित्र परिवाराकडे किंवा कामानिमित्त मुंबई, पुणे या ठिकाणी असणारे नागरिक कोणतीही तपासणी न करता मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. कोणतीही तपासणी न करता थेट गावात आल्यामुळे करोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
आता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा तुटपुंजी आहे. तसेच बाहेरुन आलेल्या नागरिकांसाठी नातेवाईकांच्या दबावामुळे गावातील राजकीय हस्तक्षेपामुळे कसल्याही प्रकारची तपासणी होत नाही. त्यांचा वावर सतत अन्य सामान्य नागरिकांमध्ये होतोय. त्यामुळे या ठिकाणचे मूळ रहिवासी आहे. ते घाबरलेल्या परिस्थितीत आहेत, तर गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील हे देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
कामशेत आणि वडगावपासून काही अंतरावर असलेल्या अहिरवडे गावात मंगळवारी (दि. 19) एक पस्तीस वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोना आता कामशेतपर्यंत आला असून तो पवनानगरच्या ग्रामीण भागात यायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे पवनमावळ परिसरात भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. महसूल विभागांना कळवूनही देखील महसूल विभाग मुंबई पुण्यावरुन आलेल्या लोकांची तपासणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
महसूल विभाग केवळ तोंडी विचारपूस करून फक्त कागदी घोडे नाचवित आहेत. तलाठी, ग्रामसेवकपण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी समिती स्थापन करुन लवकरात लवकर नियमावली आखली पाहिजे, असा सूर आहे.
गावागावात स्वयंसेवक हवेत…
ग्रामीण भागात रुग्ण वाढले, तर नियंत्रण कसे राहणार हा ही प्रश्न उपस्थित होतोय. खेडेगावात शासनाने जीवनावश्यक सेवा, सुविधा पोहचविल्या पाहिजेत आणि आरोग्य सुविधा वाढवली पाहिजे. तर ग्रामीण भागातील बाजारपेठेत गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे, तर यासाठी त्या-त्या भागातील स्वयंसेवक नेमले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.