कोरेगाव – कोरेगावमध्ये मोठ्य प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे हे विशिष्ट हेतूने आणि व्यक्तिद्वेषातून नगरपंचायतीच्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत. अशी नाहक बदनामी करणार्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, स्वीकृत नगरसेवक जयवंत पवार, फिरोज काझी, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, सागर वीरकर, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, वनमाला बर्गे, संगीता ओसवाल, शीतल बर्गे, संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, माजी नगरसेवक सचिन बर्गे, शिवसेना शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, अनिकेत सूर्यवंशी व संजय दुबळे उपस्थित होते.
उबाळे हे केवळ कोरेगावातच नव्हे, सातारा जिल्ह्यातील अनेक विकासकामांवर आक्षेप घेऊन, प्रशासनास वेठीस धरत आहेत. त्यांनी अधिकार्यांवर केलेले आरोप आणि केलेली आंदोलने पाहता त्यांचा दृष्टिकोन काय असू शकतो, हे संपूर्ण जिल्ह्याला समजले आहे. कोरेगावातील कामांची जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र पथकामार्फत पाहणी करावी. त्यात काही चुकीचे आढळल्यास कारवाई करावी. मात्र, कोणतीही चूक नसल्यास उबाळे यांच्यावर कडक कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही नागेश पाटील यांनी दिली.