वडूज – शरद पवारांनी कधीही छत्रपतींचे नाव घेतले नाही. मात्र, जातीपातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले, असा घाणाघात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला.
माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कातरखटाव येथील कोपरासभेत ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, धनंजय चव्हाण, सदाशिव खाडे, विक्रम कदम, सोमनाथ भोसले, विशाल बागल, अजित सिंहासने, अमोल बागल, विजय बागल, सुरज पाटील, रामचंद्र देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, ‘‘शरद पवार जातीपातीमध्ये भांडणे लावण्यात कुशल आहेत. मराठा आरक्षणाचे खरे शत्रु शरद पवार आहेत. त्यांनी मराठा आरक्षणास खोडा घालण्याचे काम केले. स्वतःला जाणता राजा म्हणून घेणा-यांची मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. मोहिते पाटलांनी लाखो लोकांचे ऊसाचे पैसे बुडविले आहेत. त्यांच्यावर बत्तीस गुन्हे दाखल आहेत. अशा लोकांना निवडून देऊ नका. भाजपने आपल्या भागात विकास केला आहे. पाणी आणण्याचे काम फक्त भाजप करु शकते. त्यामुळे भाजपला निवडून दिले पाहिजे.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, भाजपने भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. कोणत्याही पंतप्रधानाला जमले नाही ते मोदींनी करुन दाखवले. शरद पवारांनी माणसात माणूस ठेवला नाही. सध्या पवारांनी दिलेला उमेदवार गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. देशाचा कायापालट करायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करावे लागेल. आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा निवडून द्यावे लागणार आहे. यावेळी धनंजय चव्हाण, डॉ. येळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धनंजय चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशोक बागल, नानासो शिंदे, सदाशिव बागल, विजय बागल, प्रसाद निकम, विक्रम रोमण, जाहीद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.