मुंबई – आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ आता अव्वलस्थानी आला आहे. मात्र, मायदेशात तसेच ऑस्ट्रेलियात येत्या काळात होत असलेल्या कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवावा लागेल तरच त्यांना यावेळीही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णित राखून भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाच्या या मोहिमेला त्यामुळे वेग आला आहे. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करत ७ गडी राखून विजय मिळवला व मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
जून २०२३ सालापासून त्या वर्षीच्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर यंदाच्या स्पर्धेचे नवे वर्ष सुरु झाले. तेव्हापासून भारताने आतापर्यंत २०२३-२०२५ सालच्या या नव्या स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारताने दोन्ही देशांमध्ये २-२ कसोटी सामने खेळले. वेस्ट इंडिजमध्ये भारताचा एक विजय आणि एक सामना अनिर्णित राहिला. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेत संघाला १ विजय मिळाला आणि १ पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेत प्रत्येक संघाला किमान ६ मालिका खेळायच्या असतात. प्रत्येक संघाच्या मालिकेतील सामन्यांची संख्या निश्चित नसते. काही मालिकांमध्ये फक्त २ कसोटी सामने आहेत, तर काही मालिकांमध्ये ५ कसोटी सामने आहेत. अशा स्थितीत एकूण गुणांच्या आधारे क्रमवारी लावली असती तर जे संघ अधिक कसोटी सामने खेळतात त्यांना अधिक फायदा झाला असता. ही परिस्थिती टाळण्यासाठी आयसीसी टक्केवारी गुणांना महत्त्व देते आणि अशा प्रकारे क्रमवारी ठरवली जाते.
इंग्लंडचा संघ ३ वर्षांनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. यावेळी मालिकेत ५ कसोटी सामने होणार आहेत. पहिली कसोटी २५ ते २९ जानेवारी, दुसरी कसोटी २ ते ६ फेब्रुवारी, तिसरी कसोटी १५ ते १९ फेब्रुवारी, चौथी कसोटी २३ ते २७ फेब्रुवारी आणि पाचवी कसोटी ७ ते ११ मार्च या कालावधीत खेळवली जाईल. या अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. ५ सामन्यांच्या मालिकेत हे सामने स्पर्धात्मक असतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी मालिका ऑगस्ट २०२१ साली इंग्लंडमध्ये झाली होती. ५ कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. भारतामध्ये या दोघांमधील शेवटची मालिका फेब्रुवारी २०२१ साली झाली होती. ही ४ कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-१ अशी जिंकली होती.
भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ही मालिका जिंकणे संघासाठी महत्त्वाचे असेल, कारण ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार आहे. या मालिकेत ५ कसोटी सामने होणार आहेत. सीना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमधील ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे जो गेल्या १० वर्षांत भारताविरुद्धएकही कसोटी मालिका जिंकू शकला नाही. संघाचा शेवटचा विजय २०१४ मध्ये त्यांच्याच घरच्या मैदानावर होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ मालिकेत २-१ अशा फरकाने पराभव केला होता. अशा स्थितीत ५ कसोटी मालिका भारताबरोबरच ऑस्ट्रेलियासाठीही आव्हानात्मक ठरू शकते.
आयसीसीने सुरु केलेल्या या स्पर्धेच्या (२०१९-२०२१) आणि (२०२१-२३) या दोन्ही मोसमांच्या अंतिम फेरीत भारतीय संघ खेळला आहे. पहिल्या मोसमात भारत गुणतालिकेत अव्वल होता. तर दुसर्या मोसमात भारत दुसऱ्या स्थानावर होता. पहिल्या वेळी अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या मोसमात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. आता जर भारतीय संघाने यंदाही अंतिम फेरी गाठली तर त्यांना पहिल्या दोन्ही स्पर्धांतील अपयश पुसुन काढता येणार आहे.
सर्वात कमी कसोटी भारत खेळतो
भारतीय संघ या स्पर्धेच्या एका सर्कलमध्ये १७ ते १८ सामने खेळतो. पहिल्या सत्रात भारताने १७ सामने खेळले त्यापैकी १२ जिंकले, ४ गमावले आणि १ अनिर्णित राहिला. त्याच वेळी दुसऱ्या सर्कलमध्ये भारताने १८ सामन्यांपैकी १० जिंकले आणि ५ गमावले, तर ३ अनिर्णित राहिले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया भारतीय संघापेक्षा जास्त कसोटी सामने खेळतात.