इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे पाकिस्तानात हल्ला केला आहे. त्याला पाकनेही प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील जैश अल अदल या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय इराणच्या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारताचा फोबिया असणार्यांना यात वेगळाच वास येतो आहे. त्याचे कारण भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी नुकताच दोन दिवसांचा इराण दौरा केला होता. त्यांच्या इराण भेटीशी पाकिस्तानातील हल्ल्याची तार जोडण्याचा प्रयत्न पाकिस्तान आपल्या स्वभावानुसार करेलच. त्यांची काही मित्रराष्ट्रेही त्यांना या कामी भरीस घालतील. मुख्य मुद्दा आहे दहशतवादाचा. तो येथे पुन्हा दुर्लक्षित होईल. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जगातील सध्याची स्थिती पाहता ज्या वेगाने ध्रुवीकरण सुरू आहे ते आणखी एका युद्धाचा भडका उडण्याचे संकेत देत असून ते कोणाच्याही भल्याचे नाही.
इराणचा पाकच्या भूभागातील हल्ला हा प्रामुख्याने जैश अल अदलला लक्ष्य करण्यासाठी होता. या संघटनेच्या खुणा यापुढेही आढळून आल्या तर आम्ही पुन्हा हल्ला करू, असेही इराणने म्हटले आहे. त्यावर पाकिस्तान भडकला आहे. अमेरिकेने पाकिस्तानात माणसे पाठवून ओसामा बीन लादेनला ठार मारले होते. त्याचा मृतदेह खोल समुद्रात नेऊन टाकला. तेव्हा पाकिस्तान काहीच बोलू शकला नाही. पाकिस्तानचे कथित सर्वशक्तिमान लष्कर आणि त्यांची कुख्यात आयएसआय ही गुप्तचर संघटना त्यावेळी सणसणीत चपराक बसल्यासारखे गप्प होते. आताच्या म्हणजे कालच्या घटनेत पाकिस्तानला कंठ फुटला आहे. त्यांनी इराणच्या हल्ल्याला उत्तर दिले.
तेहरानमधील आपल्या दूताला माघारी बोलावले आणि पाकिस्तानमधील इराणच्या दूतालाही देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. अर्थात, हा एक प्रक्रियेचा भाग असतो. आम्हाला हा प्रकार रूचला नाही हे त्यातून सूचित करायचे असते. ते पाकिस्तानने केले. मात्र, हे प्रकार का होत आहेत आणि आता सातत्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा बोध खरे तर पाकिस्तानने यातून घेणे गरजेचे आहे. तो त्यांनी घेतला नाही तर त्यांच्यामुळे जगाला विनकारण गरज नसलेल्या युद्धाची झळ सहन करावी लागू शकते. जैश अल अदल ही सुन्नीबहुल दहशतवादी संघटना आहे. इराणने 2012 मध्येच या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये अस्थैर्य माजवण्याकरता ही संघटना प्रयत्नशील आहे. त्याकरता इराणच्या दक्षिण-पूर्व भागात त्यांच्याकडून सातत्याने हल्ले सुरू असतात.
अगदी डिसेंबर महिन्यातच त्यांनी इराणच्या भागात हल्ला केला होता. त्यात इराणचे 11 पोलीस कर्मचारी मारले गेले होते. तेव्हापासून इराण भडकला आहे. या संघटनेची पाळेमुळे जोपर्यंत उखडून टाकली जात नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे इराणने जाहीर केले आहे. पाकिस्तानला त्यांनी सर्व उपलब्ध माध्यमातून सूचना केल्या होत्या. इराणच्या विरोधातील शक्तींना आपल्या भूमीत आश्रय देणे थांबवावे, असेही बजावले होते. मात्र, नेहमीप्रमाणे असल्या इशार्यांकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करणार्या पाकिस्तानला आता इराणने तडाखा दिला आहे. इराणच्या हल्ल्याला आणखी एक कंगोरा आहे. तो म्हणजे इस्रायल-हमास युद्धाचा. या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरून सध्या जे राजकारण सुरू झाले आहे ते विशेषत: इस्लामी देशांना प्रभावित करते आहे. इस्रायलला तडाखा देणार्या हमासला कुठेतरी इराणची फूस आहे. हा एकमेव देश असा आहे की जो उघडपणे हमासच्या बाजूने उभा राहीला आहे.
लेबनान, सीरिया, इराक आणि येमेनच्या ज्या ज्या भागात अमेरिका अथवा इस्रायलचा प्रभाव आहे अथवा ताबा आहे त्या भागांवरही इराणने हल्ले केले आहेत. हमाससोबतच ते हिज्बुल्लाह या आणखी एका दहशतवादी संघटनेचे समर्थन करते आहे आणि इस्रायलवर हल्ले करण्यात हिज्बुल्लाह देखील सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी इराणवरच हल्ला झाला होता. हा हल्ला अमेरिका अथवा इस्रायलचा असल्याचा संशय इराणला होता. तथापि, त्यांच्या अनुमानाच्या अत्यंत विपरीत असे इसिस या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या प्रकारला वेगळे अर्थात जुनेच वळण लागले असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. ही अस्थिरता अथवा हल्ले प्रतिहल्ले म्हणजे जुनाच शिया आणि सुन्नी संघर्ष उफाळून येत असल्याचे यामधून सूचित होते आहे. जैश अल अदल ही सुन्नी संघटना आहे आणि ती इराणच्या विरोधात सक्रिय असल्याचे कारणच शिया इराणला लक्ष्य करणे आहे.
लाल समुद्रातही गेल्या पंधरवड्यापासून मोठा संघर्ष पेटला आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडे येणार्या जाणार्या जहाजांवर हौथी बंडखोरांकडून हल्ले केले जात असल्यामुळे अमेरिकाही चवताळली आहे. त्या देशाचे अध्यक्ष बायडेन यांनीच हौथींना निर्वाणीचा इशारा दिला आहे. हौथींना इराणचाच पाठिंबा आहे, असे मानले जाते. थोडक्यात, अमेरिका आणि इस्रायलला छेडतानाच आपल्याला तापदायक ठरणारी संघटना जैश अशा तीन आघाड्यांवर इराण लढतो आहे. पाकिस्तानचा भारताविरूद्धचा दावा उभ्या जगाला ज्ञात आहे. दहशतवाद हे संपूर्ण मानवतेवर संकट असल्याची भूमिका भारताने कायमच मांडली आहे. भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल अशा सगळ्याच देशांना दहशतवादाची झळ बसली आहे.
मात्र, आता इस्लामी राष्ट्रेही दहशतवादाच्या तडाख्यात सापडताना दिसत आहेत. त्याची झळ इराणला बसली आहे. जगभरातील सर्वच दहशतवादी संघटनांच्या मुळाशी गेल्यावर कुठे ना कुठे त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंतच पोहोचल्याचे अनेक देशांना आढळून आले आहे. त्याबरहुकुम त्या देशांनी कारवाईही केली आहे. मात्र दहशतवाद हाच जर पाकिस्तानने आपल्या राजकीय धोरणाचा भाग म्हणून स्वीकारला असेल तर त्यांचे भविष्य अंधकाराच्या दिशेने वाटचाल करते आहे. त्याचसोबत जगालाही ते न परवडणार्या भडक्याकडे नेताना दिसत आहेत.