मुंबई – देशांतर्गत स्पर्धेतील मानाची समजली जात असलेली सय्यद मुश्ताक अली स्पर्धा येत्या 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी पुन्हा एकदा करोनाचे सावट निर्माण झाले आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या मुंबई संघातील चार खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले आहे.
या चारही खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यात आले असून बाकी संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाला आहे.
मुंबई संघाचा एलिट अ गटात समावेश असून त्यांचे सर्व सामने गुवाहाटीत होणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 20 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी संघाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.
त्याचे अहवाल मिळाले असून संघातील सर्फराज खान, शम्स मुलानी, साईराज पाटील व प्रशांत सोळंकी हे चारही खेळाडू करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. सध्या या चार खेळाडूंना घरी पाठवण्यात आले असून, त्यांना विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे चारही खेळाडू गट साखळी फेरीतील सामने खेळू शकणार नाहीत.