बीड – अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र बीडमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेवासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. बालविवाह झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात सर्रासपणे अल्पवयीन विवाह लावले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. बाल विवाह प्रतिबंधक कायदा असताना या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याने या कायद्याचा धाक राहिला नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरिबी, अज्ञान आणि मुलीची असुरक्षितता, यामुळे लग्न लावून देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान अहमदनगरसह उस्मानाबादमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच बालविवाहाचे प्रकरण समोर आले होते.