मुंबई : महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी अंधारे यांनी.”मुख्यमंत्री एकनाथ भाऊ आहेत हा गैरसमज ठेवू नका. कारण, सर्व कामे देवेंद्र फडणवीस यांच्याच इशाऱ्याने होतात”, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले.
यावेळी सभेत बोलताना अंधारे यांनी, काही दिवसांपूर्वी एका गाडीत एकनाथ शिंदे बाजूला बसले होते आणि स्टेयरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होतं. हेच खरं चित्र असल्याचा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. पुढे बोलताना अंधारे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “माझे 40 भाऊ कॉपी करून पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. माझ्या भावांकडे सगळी खाती कपडे फाडण्याची आहेत,” असा टोलाही अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.
राज्यात महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्हाला खात्री आहे की, येत्या निवडणुकीत उद्धवसाहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही अंधारे यांनी बोलून दाखवला. यावेळी अंधारे यांनी सभेत किरीट सोमय्या यांचे काही व्हिडीओ देखील दाखवले. यामध्ये त्यांनी नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, आनंद अडसूळ, अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच चौकशा आता का थांबल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे नाव न घेता यांच्यावर देखील टीका केली. संजय राठोड हे आता निर्दोष वाटत असतील तर पूजा राठोडची जाणीवपूर्वक बदनामी केली. तिची राजकीय शिडी केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. बिकेसीला मेळावा झाला, करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी किरीट सोमय्या गप्प का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. आंदोलन करणारे अण्णा हजारे आता कुठे गेले? आता लवकर उठा, असा टोलाही त्यांनी आण्णा हजारेंना लगावला.
तसेच राज्यातील वातावरणावर बोलताना,”महापुरुषांचे अपमान होताना देवेंद्र फडणवीस गप्प बसलेत असेही अंधारे म्हणाल्या. कर्नाटकमध्ये आमच्या गाड्या तोडतात, त्यांचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलतात पण आमचे मुख्यमंत्री जेवायला, गरबा खेळायला, गुवाहाटीला जातात असेही त्या म्हणाल्या. महापुरुषांचा अवमान होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटलाय, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार एक शब्दही बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे अंधारे म्हणाल्या.