अस्मानी संकट
भिलार येथे 2005 साली झालेल्या भूस्खलनानंतर हे अस्मानी संकट घोटेघर सुलेवाडी व रांजणी गावावर घोंगावत आहे. तसेच पांगरी व तायघट (ता. महाबळेश्वर) या ठिकाणीही असेच शेतीला भेगा पडल्या आहेत.
पाचगणी – घोटेघर सुलेवाडी (ता. जावळी) या डोंगर परिसरात झालेल्या भूस्खलनाची एक ते दीड किलोमीटर या तीन टप्प्यातील जिल्हा परिषदेचे भूगर्भ तज्ज्ञ टोणपे यांनी पाहणी केली. यावेळी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सातारा जावळीच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख, जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे – फडतरे, सभापती जयश्री गिरी, जावळीचे गटविकास अधिकारी पाटील, बांधकाम विभागाचे निकम, विस्तार अधिकारी निकम, रांजणीचे तलाठी व्ही. टी. घोरपडे, घोटेघरचे सरपंच राजू महाडिक, रांजणीचे सरपंच सुनील सपकाळ, पोलीस पाटील किरण जंगम, घोटेघर, सुलेवाडी रांजणीचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे भूगर्भ तज्ञ टोणपे या भूस्खलन झालेल्या घोटेघर सुलेवाडी येथील जमिनीची पहाणी केली आहे. त्याचा अहवाल करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास केंद्रीय भूगर्भ तज्ज्ञांचीसुद्धा मदत घेतली जाईल, असे प्रांत स्वाती देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, धोका असलेल्या सुलेवाडी येथील पाच घरांना रस्त्याच्यावरील गावठाणात तात्पुरते स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. तसेच रांजणी येथील भूस्खलन परिसराच्या खाली येणाऱ्या ग्रामस्थांना धोकादायक परिस्थिती नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.
तूर्तास तरी भुसखलन परिसराच्या खाली येणाऱ्या कटुंबानी पाऊस संपेपर्यंत रात्रीच्या निवासाची सोय गावाच्या बाहेरील घरांच्यामध्ये करण्यास सुचविले आहे. तसेच रांजणी ता. जावळी येथे जाऊन ग्रामस्थांची चर्चा करून मनातील भीती दूर करीत शासकीय पातळीवरून पूर्णतः मदत केली जाईल, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.