खटाव – आपल्या अमोघ वाणीने जनमाणसाच्या मनावर आरुढ असणाऱ्या भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, कणखर व्यक्तिमत्व, आदरणीय ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्यावतीने देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे खटाव-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे नेते महेश शिंदे यांनी आज दि. 8 ऑगस्ट रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्र उभारणीत स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचे मोठे योगदान होते. देशाच्या परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला होता. परदेशातील अनेक गरजू भारतीयांना न्याय दिला होता. त्यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव कधीही भरून येणार नाही. त्यामुळे या दु:खाच्या परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, असे महेश शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शुभेच्छा व भेटवस्तू देणे टाळावे. तसेच कोणताही समारंभ साजरा करू नये असे महेश शिंदे यांनी सांगितले आहे.