फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने खूप गांभीर्याने घेतल्या आहेत. काही झाले तरी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजेच राजे गटाचेच वर्चस्व राहिले पाहिजे, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले.
येथील अनंत मंगल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामराजे बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या उपसभापती सौ. रेखाताई खरात, पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष सतीश माने, महिला अध्यक्षा सौ. रेश्मा भोसले,तालुका दूध संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशिवाय इतर कोणतीही चुकीची प्रवृत्ती वाढू देणे आपल्या हिताचे ठरणार नाही. आजपर्यंत आपण गेल्या 25 वर्षांमध्ये खूप कष्टाने या तालुक्यातील विकास कामे केली असून या विकास कामाला वाईट प्रवृत्तीची दृष्ट लागता कामा नये, असेही रामराजे यांनी सांगितले.