नियमित धान्य वाटप मात्र सुरू
पिंपरी – “करोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थतीमुळे सरकारकडून मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप मोफत धान्य शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्येच पोहचले नाही. यामुळे मोफत धान्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना कार्डधारकांना एप्रिल महिन्यासाठी नियमित धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. संबंधितांनी दरमहा दिले जाणारे धान्य घेतल्यानंतर काही कालावधीने त्यांना मोफत धान्य दिले जाणार आहे.
शहरामध्ये अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेचे पिंपरी विभागातंर्गत 36 हजार 121 लाभार्थी आहेत. तर, चिंचवड विभागातंर्गत 37 हजार 713 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा नियमित दिल्या जाणाऱ्या एप्रिल महिन्यातील धान्य वाटपाला एक एप्रिलपासून सुरुवात झाली. त्यामध्ये 2 रूपये किलो गहू आणि 3 रूपये किलो दराने तांदूळ वितरित केले जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून हे धान्य वितरित केले जात आहे.
गर्दी टाळण्याचे प्रयत्न
कार्डधारकांना दूरध्वनी करून किंवा मेसेज पाठवून गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने बोलावले जात आहे. दुकानांसमोर प्रत्येकी 1 मीटर अंतरावर “सोशल डिस्टसिंग’ ठेवण्यासाठी चौकोनी पट्टे बनविण्यात आले आहे. हात धुण्यासाठी सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केली आहे. झोपडपट्टी क्षेत्रात धान्य घरपोच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अजून काही दिवसांचा कालावधी
अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणारे धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीसाठी प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यातील तांदूळ अनुक्रमे एप्रिल, मे आणि जून महिन्यातच वितरित केले जाईल. त्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि. 31 मार्च) निघाला. संबंधित तांदूळ मिळण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या दरमहा दिले जाणारे धान्यच उपलब्ध आहे. मोफत धान्य अद्याप मिळालेले नाही. संबंधित धान्य मिळाल्यानंतर त्याबाबतची माहिती व्हॉट्सऍप किंवा मेसेजद्वारे कार्डधारकांना कळविण्यात येईल. स्वस्त धान्य दुकानदार सध्या मोठी “रिस्क’ घेऊन काम करीत आहेत. त्यांना शासनाने विमा संरक्षण द्यायला हवे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशन (महाराष्ट्र)
शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य हे अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. नियमित धान्य घेतल्यानंतरच त्यांना हे मोफत धान्य मिळेल. ते देखील एप्रिल, मे आणि जून असे दरमहा मिळेल. हे धान्य वाटप लवकरच सुरू होणार आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी शिधापत्रिका कार्यालय.