नगर, (प्रतिनिधी) – रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. सार्वजनिक कॅप्टिव्ह मार्केट योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साड्यांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधा पत्रिका धारकांची संख्या ८८ हजार ३७ आहे. जिल्ह्यासाठी ६३ हजार ४०२ साड्या आल्या आहेत. श्रीरामपूर, राहाता, राहुरी आणि नेवासे तालुक्यांसाठी साड्या दोन दिवसांमध्ये येणार आहेत. त्यानंतर लगेच स्वस्त धान्य दुकानामार्फत साड्यांचे वाटप होणार आहे.
राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने या संदर्भातील निर्णय राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला होता. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत दिली जाणार आहे. राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबविणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळास एका साडीसाठी ३५५ रुपये दिले आहेत. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
नगर- ४ हजार ७४६, नेवासे- ७ हजार १५७, श्रीगोंदे- ८ हजार ७४४, पारनेर- ३ हजार ६३८, पाथर्डी- ६ हजार २६७, शेवगाव- ९ हजार ७५८, संगमनेर- ६ हजार ३८६, अकोले- ६ हजार १९९, श्रीरामपूर- ५ हजार ७३४, राहुरी- ६ हजार १५२, कर्जत- ३ हजार ५४७, जामखेड – ५ हजार ६३८, राहाता- ५ हजार ५९२, कोपरगाव- ६ हजार ७७८, नगर शहर- १ हजार ७०१ असे एकूण – ८८ हजार ३७ साड्यांचे वाटप होणार आहे.
जिल्ह्यामध्ये १ हजार ८८७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. आता अंत्योदय योजनेतील साड्यांचे वाटप या दुकानांच्या माध्यमातून होणार आहे. अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकेवर एक साडी दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थित लवकरच साड्यांचे वाटप होणार आहे. – हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी